विमान अपघातानंतर विकृतीचा कळस!   

महिलेचे शीर रस्त्यावर, उपस्थितांनी सेल्फी घेतले

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये गुरुवारी एअर इंडिया विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघाताने संपूर्ण देश हादरला. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतले आणि काही वेळातच नियंत्रण सुटून हे विमान मेघानीनगर परिसरात कोसळले. विमानात २४२ प्रवासी आणि कर्मचारी होते. या दुर्घटनेत एकूण २६५ लोकांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी जळालेले अवशेष, धूर आणि लोकांचे मृतदेह विखुरलेले होते. ही दृश्य पाहून देशभरात हळहळ व्यक्त केली जात असताना एक संतापजनक प्रकार समोर आला.
 
विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर मोठा स्फोट झाल्याने अपघाताची तीव्रता खूप जास्त होती. विमानाचे काही भाग इमारतींवर आदळले. त्यामुळे तिथेही नुकसान झाले. घटनास्थळावर आगीचे मोठे लोट दिसत होते. सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले होते. विमानाचे अवशेष जळालेल्या अवस्थेत होते. माणसांचे मृतदेह आणि त्यांचे अवयव विखुरलेले पडले होते. बहुतांश प्रवाशांचे मृतदेह ओळखणेही कठीण झाले होते. काही मृतदेह अर्धवट जळालेले होते, तर काही पूर्णपणे जळून खाक झाले होते. या हृदयद्रावक घटनेनंतर एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.
 
अपघातानंतर सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले. त्यातील एका व्हिडिओने सगळ्यांना लाज वाटेल असे कृत्य उघडकीस आणले. एका महिलेचे शीर धडावेगळे होऊन रस्त्यावर पडले होते. त्या ठिकाणी मदतीसाठी धावण्याऐवजी काही लोक त्या शीरासोबत सेल्फी काढत होते. त्याचे व्हिडिओ बनवत होते. हे पाहून "माणुसकी संपली आहे का?" असा प्रश्न निर्माण झाला. लोकांच्या या वागणुकीमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
 

Related Articles